फडणवीसांच्या बचावासाठी आशिष शेलार मैदानात !
फडणवीसांच्या बचावासाठी आशिष शेलार मैदानात !
मलिकांचे आरोप म्हणजे न शिजलेल्या “बिर्याणी”चा प्रकार
मुंबई, दि. 10 नोव्हेंबर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि भाजपात आरोपांचा कलगीतुरा सुरू आहे. मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावताच भाजपाकडून बचाव करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला जात आहे. आज मलिक यांनी आरोप करताच भाजपाचे आशिष शेलार व चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांचा बचाव केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला.
मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मलिक यांनी केलेल्या आरोपाचा आमदार आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला.आशिष शेलार म्हणाले की,. जे आरोप केले त्यात काही तथ्य नाही. कितीही खोदकाम केले तरी आरोप करायला सुद्धा तुम्हाला काहीही सापडू शकलेले नाही. मुन्ना यादव, हाजी अराफत शेख, हाजी हैदर आझम हे तिघेही भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध अध्यक्षपदी बसवण्यात आले होते. यापैकी हाजी अराफत शेख, हाजी हैदर आझम त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या नेमणुका कायदेशीर झाल्या होत्या. मुन्ना यादव यांच्यावर राजकीय आंदोलनाचे आरोप आहेत.
गेल्या दोन वर्ष तर नवाब मलिक यांचे सरकार आहे. विशेषतः नवाब मलिक यांच्या पक्षाकडे गृह मंत्रिपद आहे. आज ते ज्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत त्या हाजी हराफत शेख आणि हाजी हैदर आझम यांच्यावर गेल्या दोन वर्षात साधा दखलपात्र गुन्ह्याची नोंद नाही. असले तर आंदोलनाचे गुन्हे असतील. नवाब मलिक यांनी सांगितले तो, मोहम्मद आलम शेख हा हाजी हराफत शेख यांचा भाऊ जेव्हा पकडला गेला तेव्हा काँग्रेसचा सचिव होता आणि सध्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे.
रोज एक आरोप करायचा आणि पळ काढायचा धंदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यांनी रियाज भाटीचा उल्लेख केला व फोटो दाखवले मग हे फोटो आम्ही दाखवतो असे म्हणत आमदार आशिष शेलार यांनी आघाडीच्या नेत्यांसोबतचे रियाज भाटीचे फोटो दाखवले.
पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान कार्यक्रम ह्याच्याशी
बाकी यांचा काहीही संबंध संपर्क नाही फोटोवरच संबंध प्रस्थापित करायचे असतील तर मी दाखवणार नव्हतो पण आता हे फोटो सगळे हा फोटो कोणा बरोबर आहे असे म्हणत नाव न घेता राष्ट्रवादीचे शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, असलम शेख यांच्या सोबतचे रियाज भाटी याचे फोटो दाखवले. म्हणून राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका. राजकारणात नीचतेची ही नवी ‘नवाबी पातळी’ करू नये, असा टोला त्यांनी लगावला.
रियाझ भाटी गायब असल्याचं सांगितलं जातं. तो गायब आहे की त्याला पळवलं गेलं. रियाझ भाटीला पळवून नेण्याचं काम तर राष्ट्रवादीने केलं नाही ना हा आमचा आरोप आहे. वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावे समोर आली. त्यात रियाझचं नावही आलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. रियाझ कोठडीत आला तर सत्यबाहेर येईल. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना पळवून लावले कींवा सुरक्षित स्थळी ठेवले तर नाही ना अशी शंका येत आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांचा रियाझ भाटीशी संबंध आणि संपर्कही नाही. क्रिकेटच्या राजकारणात रियाझला राजाश्रय कुणी दिलं? असा सवाल करतानाच पण आम्ही कोणत्याही बड्या नेत्याचं नाव घेऊन सेन्सेशन करणार नाही. ती आमची प्रथा. परंपरा नाही. आम्ही ते करणार नाही, असं ते म्हणाले.
