सैनिक व शेतकऱ्यांप्रती बाळगावी संवेदनशिलता
सैनिक व शेतकऱ्यांप्रती बाळगावी संवेदनशिलता…
नाशिक, दि. 8 नोव्हेंबर:
आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात या विजय मशालीचे स्वागत व सन्मान करण्यात आला आहे. या मशालीच्या माध्यमातून देशाच्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य आहे. देशाच्या संरक्षणासाठी सतत कार्यशील असणारे सैनिक आणि आपले शेतकरी बांधव यांच्याबाबत आपण सर्वांनी संवेदशीलता बाळगावी, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी स्वर्णिम विजयी वर्षाच्या निमित्ताने विजय मशालीच्या भव्य निरोप समारंभ प्रसंगी केले आहे.
1971 साली झालेल्या भारत पाकीस्तानच्या युद्धातील लेफ्टनंट कर्नल डब्लु. एन. गोखले, पी. एस. कमल, कॅप्टन वसंत सहस्त्रबुद्धे, कमांडर विनायक आगाशे, ब्रिगेडीयर मधु महुगणी, कर्नल पी. बी. पांडे, शहीद शिपाई कोंडाजी दराडे यांच्या वीरपत्नी भागुबाई दराडे, नायक विश्वनाथ बाग, शिपाई धोंडू चिट्टे, सुभेदार राजाराम सुर्यवंशी, हवालदार कचरु साळवे, ज्युनिअर वॉरंट ऑफीसर किरण निकम यांचा सन्मानचिन्ह देवू सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला जाट रेजिमेंटचे कॅप्टन व्हि. एल. डिका यांच्याकडून विजय मशालीचा स्विकार करून पालकमंत्री भुजबळ यांनी विजय मशाल कार्यक्रमस्थळी प्रस्थापित केली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी 1971 च्या भारत-पाक युद्धातील हुतात्मा झालेल्या योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून गौरवशाली विजय मशालीचा सन्मान करण्यात आला. यानंतर तोफखाना येथील जवानांनी सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि आर्टिलरी सेंटरच्या सैनिकांनी पीटी कवायत सादर केली. तसेच घोडे आणि घोडेस्वारांच्या नेत्र दिपक कसरतींचे अश्वारोहण प्रदर्शन सादर करण्यात आले.
