तापी महाकाय पूर्णभरण योजना प्रकल्पाला गती
तापी महाकाय पूर्णभरण योजना प्रकल्पाला गती..
सहा नद्यांच्या एकत्रीकरणातून जिल्हा ‘सुजलाम सुजलाम’ करू..
अमरावती, दि. 6 नोव्हेंबर :
अमरावती जिल्ह्यातील गोदावरी व तापी खोऱ्यातील सहा नद्या केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानांतर्गत एकमेकांना जोडून पूरपरिस्थिती व दुष्काळावर मात करीत जिल्हा सुजलाम सुफलाम करणाऱ्या तापी महाकाय पूर्नभरण महत्वाकांक्षी योजना गतीने पूर्ण करण्याबाबत निर्देश राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिकाऱ्यांना दिले.
अमरावती जिल्ह्यात दहा मोठ्या व चौदा लहान अशा चोवीस नद्या वाहतात. या सर्वच नद्या मध्यम सपाट भागातून उत्तर दक्षिण वाहतात. जिल्ह्यातील पेढ़ी, पूर्णा, पिली, चंद्रभागा, शहानूर या नद्या तापीला मिळतात तर वर्धा नदी पूर्वेकडे वाहून प्राणहिता नदीला मिळते. असे असले तरी दरवर्षी भुजल पातळी कमी होत असल्याने व काही तालुक्यांमध्ये पाण्याची कमतरता असते तसेच कमी पावसामुळे काही धरणे, बंधारे कोरडे राहतात. जिल्ह्यातील तापी, पूर्णा, पेढी आणि गोदावरी खोऱ्यात वाहणाऱ्या या नद्यांना जोडणाऱ्या योजनेला जलसंपदा राज्यमंत्री कडू यांच्या मार्गदर्शनात गती मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीला दर २५ वर्षानंतर पूर येत असल्याची आतापर्यंतच्या नोंदी आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुके ड्रायझोन असून चांदूरबाजार व अचलपूर तालुके अतिशोषित आहेत. भातकुली, दर्यापुर, अंजनगावसुर्जी तालुके खारपान पट्टयातील आहेत. केंद्र सरकारच्या जलशक्ति अभियानाअंतर्गत या तालुक्यांची निवडही झालेली आहे, मात्र यावर पाहिजे त्या गतीने काम होत नाही. परिणामी जिल्हयात दुष्काळाचे सतत सावट असते. जिल्हयात ७० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक संत्रा लागवडखाली आहे. जिल्हयात वेळेवर पाऊस येत नसल्याने संत्रा उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व भातकुली हे तीन तालुके खारपाणपट्ट्यातील आहेत. जिल्हयातील सहाही नदीचा परिसर मध्यम सपाट उंचीच्या भागाचा आहे. सर्वच नद्यांचे पाणलोट क्षेत्र भिन्न असल्याने एकाच वेळी सर्वच नद्यांना पूर येत नाही. शिवाय तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात तापीचे पाणी अचलपुर तालुक्यात आणण्याचे प्रस्तावित आहे.
पश्चिमवाहिनी पेढी, पूर्णा, पिली, शहानूर, चंद्रभागा या नद्या पुढे तापीला तर पूर्ववाहिनी वर्धा ही प्राणहिता व नंतर गोदावरीला मिळते. पूर्वेकडील राजुरवाडी (ता. तिवसा) येथील वर्धा नदी व पश्चिमेकडील शहानूर नदी (ता. अचलपूर) यांचे एका आडव्या रेषेत सर्वात कमी अंतर आहे. या रेषेला छेदून पेढी, पूर्णा, पिली व चंद्रभागा नद्या वाहतात. त्या एकसमान जलपातळीच्या कालव्याने एकमेकांना जोडल्यास सर्व नद्या आपापल्या क्षमतेने किंवा बारमाही समान वाहून पूरपरिस्थितीत नियोजन होऊ शकते.
परिणामी अतिशोषित व ड्रायझोन तालुके आणि खारपाणपट्ट्यातील अंजनगावसुर्जी, दर्यापूर व भातकुली अशा सहा तालुक्यांना फायदा होऊ शकतो. जलशक्ती अभियानांतर्गत व्यवहार्यता तपासणीसाठी सकारात्मक शास्त्रोक्त अभ्यासाची आवश्यकता असून या अनुषंगाने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील अधिका-यासोबत चर्चा करुन प्रकल्पाद्वारे अचलपूर मतदार संघासह अमरावती जिल्ह्याला या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत.
तापी महाकाय पुनर्भरणची जोड प्रस्तावित तापी महाकाय पुनर्भरण योजनेच्या डाव्या कालव्याद्वारे तापीचे पाणी इच्छापूर येथून अचलपूर तालुक्यात येईल. त्याला संभाव्य कालवा जोडला जाऊ शकते.
वर्धा नदीवर राजुरवाडीपासून शहानुर नदी ही सर्वात कमी अंतराच्या एका रेषेत एका जलपातळीत जोडल्यास त्याला छेदून जाणाऱ्या या जिल्ह्यातील सहा नद्या या बारमाही वाहु शकतात, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते, खारपाण क्षेत्रात गोडपाणी बारमाही उपलब्ध होऊ शकते. ड्रायझोन तालुक्यात व अतिशोषित तालुक्यात भूगर्भीय जल पातळीत वाढ होऊ शकते. धोक्यात आलेले संत्रा क्षेत्र व संत्रा उत्पादक कोरडवाहू शेतकरी संकटापासून वाचविले जाऊ शकतात. या प्रकल्पासाठी वर्धा (राजुरवाडी) ते शाहनूर (अंजनगावसुर्जी) एवढी लांब व केवळ 100 मीटर रुंद जमीन संपादित करावी लागेल. त्यापैकी 60 मीटर रुंद कालवा, दोन्ही बाजूला प्रत्येकी 15 मीटर मातीची भींत तसेच भिंतीपासून प्रत्येकी 5 मीटर संरक्षित क्षेत्र ठेवून प्रकल्प साकारला जाऊ शकतो. तापी नदीचे पाणी अचलपूर तालुक्यात आणण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा शहानूर नदीजोड प्रकल्प राबविल्यास संपूर्ण परिसर ‘ सुजलाम सुफलाम ‘ निश्चित होऊन शेतकऱ्यांची “आजीवन” आर्थिक भरभराट होईल. जिल्हयातील लाखो नागरिक शेतकरी यांच्या हिताचा महाकाय नदीजोड प्रकल्प “सकारात्मक दृष्टिकोणातून राबविण्यासाठी आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला आहे.
