500 चौ. फुट घरांंच्या करमाफीचे पुढे काय झाले?
500 चौ. फुट घरांंच्या करमाफीचे पुढे काय झाले?
मुंबई, दि. 29 आक्टोबर :
मुंबईतील इमारतींच्या भांडवली मूल्यात सुधारणा न करण्याचा निर्णय मंत्रीमंडळात झाला, त्यामुळे मालमत्ता करातील वाढ वर्षभर टळली,असे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र 500 चौ. फुटाच्या घरांंना करमाफ करणार होते त्याचे पुढे काय झाले? त्यामुळे ही नवी घोषणा म्हणजे “भुलभुलैया भाग दोन” असल्याची टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबईतील 500 चौ. फु.पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ…अशी घोषणा शिवसेनेकडून मोठा गाजावाजा करीत करण्यात आली. पण प्रत्यक्षात संपूर्ण कर माफ करण्यात आला नाही. मालमत्ता करातील सर्वसाधारण कर माफ केला. मात्र मालमत्ता करासोबत घेतले जाणारे इतर कर माफ झाले नाहीत
मुंबईत 500 चौ. फु. पर्यंत एकुण 15,36,380 सदनिका असून या सदनिकेत मधून वर्षाला सरासरी 670 कोटीचा कर जमा होतो. हा संपूर्ण माफ केला तर फक्त पहिल्या वर्षी महापालिकेच्या उत्पन्नात घट होईल. कोरोना काळात तिजोरीत खडखडाट असताना बिल्डरांना प्रिमियम मध्ये 50% सुट देऊन कोट्यवधीची खैरात वाटणाऱ्यांनी मुंबईकरांचे 670 कोटी माफ केलेले नाहीत. त्यामुळे आता नव्याने करण्यात आलेली घोषणा पण फसवी आणि हा भुलभुलैयाचा पार्ट 2 आहे, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी टीका करताना म्हटले आहे की, कोरोना काळात पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही बिल्डरांना प्रिमियममध्ये 50% सवलतींची ज्यांनी खैरात केली…त्याच शिवसेनेने “महा फसवी” घोषणा केलेला, मुंबईकरांच्या 500 चौ. फु. पर्यंतच्या घरांचा केवळ 670 कोटींचा मालमत्ता कर पुर्ण माफ करुन दाखवू शकले नाहीत..
आता महापालिकेला 1042 कोटींचा तोटा सहन करुन मुंबईकरांच्या मालमत्ता करात वर्षभर वाढ होणार नाही, अशी नवी घोषणा केली आहे. दिवाळी आहे म्हणून “महा फसव्या” घोषणांचे कंदील लावणे सुरु आहे बहुतेक. यांच्या सगळ्या घोषणा म्हणजे फसवणूकीचा धूर सोडणारे फुसके फटाकेच आहेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
