समीर वानखेडेंचा मुंबई पोलिसांवर अविश्वास का ?
समीर वानखेडेंचा मुंबई पोलिसांवर अविश्वास का ?
मुंबई दि. २८ ऑक्टोबर :
काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांचे संरक्षण मागणारा समीर दाऊद वानखेडे अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे याचा अर्थ याने फर्जीवाडा केला आहे म्हणून मुंबई पोलिसांना घाबरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आर्यन खान व इतर दोघांना हायकोर्टाने जामीन दिला आहे. कालच दोघांना एनडीपीएस कोर्टाने जामीन दिला होता. एकंदरीत आज ज्यापध्दतीने एनसीबीने युक्तीवाद केला. त्याअगोदरच ही केस किल्ला कोर्टात जामीन देण्यासारखी होती परंतु एनसीबीचे वकील नवनवीन युक्तीवाद करुन लोकांना जास्त दिवस तुरुंगात कसे ठेवता येईल असा प्रयत्न करत होते. शेवटी हायकोर्टाने जामीन दिला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
ही केस फर्जीवाडा आहे. या मुलांना जाणुनबुजुन समीर दाऊद वानखेडे याने अडकवले आहे. पुरावे घेऊन हे लोक हायकोर्टात गेले तर ही केस बाद ठरु शकते असा दावाही नवाब मलिक यांनी केला.
लोकांना तुरुंगात टाकणारा समीर दाऊद वानखेडे आज तोच कोर्टात जाऊन मुंबई पोलिसांकडे केस न देता सीबीआय किंवा एनआयएमार्फत चौकशी करा म्हणतोय मात्र मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे यांना अटक करायची असेल तर ७२ तासाची नोटीस दिली जाईल असे स्पष्ट केले आहे.
कालपर्यंत मला अटक करु नका मला संरक्षण द्या असं सांगणारा समीर दाऊद वानखेडे हायकोर्टात धाव घेतो आणि मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवतो याचा अर्थ यामध्ये काळंबेरं आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
