तक्रारदारच गायब…. तरीही केस सुरू !
तक्रारदारच गायब…. तरीही केस सुरू !
परमवीरसिंग यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
औरंगाबाद, दि. २३ ऑक्टोबर
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची १०० कोटी रुपयांच्या वसुलीची सणसणाटी आरोप करुन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आणि ते स्वतःच मागील काही महिन्यांपासून बेपत्ता आहेत. हाच धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमवीरसिंग यांचे नाव न घेता शालजोडीतून लगावले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी थेट सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्यासमोरच परमबीरसिंग यांची तक्रार केली. सरन्यायाधीश रमण्णा आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यावेळी उपस्थित होते. अनेकदा कोर्टात जाऊन जाऊन आयुष्य निघून जातं. त्याचा खर्च परवडत नाही. 1958 सालापासून एक आरोपी गायब असल्याचं तुम्ही म्हणता. पण चंद्रचूड साहेब, आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. तरीही केस सुरू आहे. तक्रारदार गायब, कुठे पळून गेला माहीत नाही. पण आरोप केलेत ना मग खणून काढ…खणलं जातंय…चौकश्या सुरू आहेत. धाडसत्र सुरू आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
परमवीर सिंग यानी महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट गृहमंत्री यांनी दिले होते असा खळबळजनक आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. याप्रकरणात अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला असूनही तेही गायब आहेत. तर आरोप केलेले परमवीरसिंही तक्रार करुन गायब झाले आहेत.
