आघाडी सरकारने जनतेवर लादलेला महाराष्ट्र बंद !
आघाडी सरकारने जनतेवर लादलेला महाराष्ट्र बंद !
तिघाडीच्या ढोंगी बंदमध्ये शेतक-याचा सहभाग नाही.
मुंबई, दि. 11 आक्टोबर :
महाराष्ट्रातील बंदला शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि जनतेचा विरोध होता पण शासकीय यंत्रणांचा गैरवापर करुन आघाडी सरकारने हा बंद जनतेवर लादला आहे. हा शासकीय “इतमामातील” बंद असून तिघाडी सरकारला जनता ही अशाच प्रकारे शासकीय “इतमामात” निरोप देईल, अशी टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.
बंदच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते पुढे म्हणाले की, आघाडी सरकारला बंद आणि स्थगिती हे दोन शब्द फार प्रिय आहेत. गेल्या पावणे दोन वर्षे याचा अनुभव महाराष्ट्रातील जनता घेते आहे. आता कुठे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांचे जनजीवन सुरळीत होते तेव्हा असे बंद लादण्यात आले. जनतेचा या बंदला विरोध होता पण शासकीय अधिकारी कालपासून जनतेच्या मनात भिती निर्माण करीत होते, पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था निर्माण होईल सांगत होते तर बेस्टचे महाव्यवस्थापक पण अशाच प्रकारे बंद यशस्वी कसे होतील या कामाला लागले होते. पोलीस संरक्षणात, भीती निर्माण करुन हा बंद लादण्यात आला त्यामुळे हा बंद शासकीय इतमामातील बंद आहे.
ज्या सोलापूरमधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंदचे आवाहन केले तिथे पहाटेपासून मार्केट यार्ड सुरु होते शेतकऱ्यांनी आपला माल यार्डात आणला, विकला. ज्या दादरमध्ये शिवसेनाभवन आहे त्या दादरच्या मंडईत शेतीमाल आला, 10 वाजेपर्यंत सर्व व्यवहार झाले शेतकऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला नाही. औरंगाबादसह राज्यातील बऱ्याच मंडयांमध्ये शेतीमाल आला व लिलावही झाले त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने या तिघाडीच्या ढोंगी बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत. तर साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज खा. छत्रपती उदयनराजे स्वतः रस्त्यावर उतरुन बाईक चालवून बंद धुडकारला. शिर्डीत सर्व व्यवहार सुरु आहेत. जनतेने, शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे. ठाकरे सरकारला
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एवढीच काळजी आहे तर तुम्ही मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, असे ही आमदार आशिष शेलार म्हणाले.
