पश्चिम बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात करण्याचा डाव 

0
IMG_20201216_183724

पश्चिम बंगालसारखी परिस्थिती महाराष्ट्रात करण्याचा डाव

सर्व यंत्रणांचा वापर करा; आमचे नेते घाबरणारे नाही

मुंबई दि. ७ ऑक्टोबर :
ईडी, एनआयए आणि एनसीबीसारख्या सर्व यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार व नेत्यांविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी केला जातोय परंतु आमचे नेते घाबरणारे नाहीत उलट सरकार अजून भक्कम होतेय असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्यापध्दतीने अजित दादांच्या कंपन्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत त्यावरून स्पष्ट होते आहे की, या राज्यात किंवा जिथे जिथे भाजप विरोधी सरकार निर्माण झाले आहे त्या सरकारला टार्गेट करून बदनाम केले जात आहे. जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होती तीच परिस्थिती राज्यात निर्माण करण्याचे काम केंद्रसरकारच्या माध्यमातून होत आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

काल जाहीर झालेला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल वेगळा लागला असला तरी ७० टक्के जागा जनतेने महाविकास आघाडीतील पक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे जितकं आम्हाला केंद्रातील भाजप सरकार टार्गेट करेल बंगालसारखी परिस्थिती या राज्यात निर्माण होईल असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

लखीमपूरमधील घटनेनंतर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून राज्यातील जनता केंद्रातील भाजपच्या जुलमी सरकारच्याविरोधात जोरदार पाठिंबा देईल असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *