ईडीची नोटीस येण्याआधी सोमय्या, चंद्रकांत पाटलांना कसं कळतं ?

0
IMG-20210404-WA0054

ईडीची नोटीस येण्याआधी सोमय्या, चंद्रकांत पाटलांना कसं कळतं ?

पारनेर, दि. २९ सप्टेंबर :
किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरुंगात जाईल…व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं ? असा सवाल करतानाच ईडीचे नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं ? याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातोय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पारनेर येथे केला.

हे सगळं महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे. त्यासाठी आपले संघटन मजबूत करायला हवे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

एजन्सीचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे. सुडाचे राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही मात्र भाजपकडून ऐनकेन प्रकारे सुरू आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात संततधार सुरू आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. पिकांचं नुकसान झाले आहे. शेतकरीच उरला नाही तर पाणी मिळून फायदा काय ?म्हणून या अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण करत,
पडेल ती किंमत देऊ पण शेतकऱ्यांना दिलासा देऊ ही महाविकास आघाडीची भूमिका आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पूर्वी चार आणे वाढले तरी आंदोलन व्हायचे मात्र महागाई दरवाढ होऊनही यावर कोण आंदोलन करत नाही. नरेंद्र मोदी यांनी लोकांना महागाईची एकप्रकारची सवयच लावली आहे. पक्षाच्या माध्यमातून हे विषय लक्षात आणून देण्यासाठी आंदोलन उभे केले पाहिजे.

नरेंद्र मोदी आपल्याला मदत करत नाही हे लक्षात आल्यावर सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले हे प्रकर्षाने पारनेरवासियांसमोर मांडले.

आमदार निलेश लंके यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार वाजत आहे. त्यांनी कोविडमध्ये जे काम केले ते न भूतो ना भविष्यती होते. लोकसंपर्क असलेला नेता म्हणून निलेश लंके यांची ओळख निर्माण झाली आहे. लोकसंपर्क असलेला नेता म्हणून निलेश लंके यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्यामुळे आज तरूण पिढीचा पक्षाकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलला असून तरुण पिढी पक्षाच्या पाठिशी उभी रहात आहे.

राळेगणसिद्धी हा परिसर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाने ओळखला जातो आता तो लोकनेते निलेश लंके यांच्या नावाने ओळखला जाईल असेही जयंत पाटील म्हणाले. देशातील व राज्यातील अनेक प्रश्नांचा उहापोह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर झाला पाहिजे असे मार्गदर्शनही जयंत पाटील यांनी केले.

यावेळी आमदार निलेश लंके, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अहमदनगर निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *