राज्यपालांनी हस्तक्षेप कमी करून पदाची प्रतिष्ठा राखावी
राज्यपालांनी हस्तक्षेप कमी करून पदाची प्रतिष्ठा राखावी.
मुंबई, दि. २१ सप्टेंबर :
महिला सुरक्षेचा प्रश्न हा काही फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादीत नसून देशभरातील महिलांचा प्रश्न आहे. त्यामुळे संसदेचं ४ दिवसांचे अधिवेशन बोलवावे हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर योग्यच आहे. राजभवन हे भाजपाचे कार्यालय झाले आहे. राज्य सरकारमध्ये राजभवन वारंवार हस्तक्षेप करत आहे. राज्यपालांचे पद हे महत्वाचे व सन्माननीय पद आहे, त्याच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादेतच काम केले तर अशी परिस्थिती उद्भवणार नाही परंतु राज्यपालांच्या माध्यमातून मागील काही वर्षात विरोधी पक्षांच्या सरकारांमध्ये हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यपालांनी पदाचा प्रतिष्ठा राखावी, अशी आमची त्यांना विनंती आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
महिला सुरक्षेच्या प्रश्नावर २ दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे ही राज्यपालांची सूचना व त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पटोले बोलत होते. पटोले पुढे म्हणाले की, साकीनाका प्रकरणातही मुख्यमंत्र्यांनी योग्य व तात्काळ पावलं उचलत कारवाई केली. अशा प्रवृतींवर जरब बसवण्यासाठी कायदे आणखी कडक करण्याची गरज असेल तर तेही करावे. पण राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामकाजात किती हस्तक्षेप करावा हा चर्चेचा विषय झाला आहे, असे पटोले म्हणाले.
