युवापिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे
युवापिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे
सांगली, दि. 11 सप्टेंबर :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ तळगाळातील सर्व तरुण पिढीला मिळवून द्यावा व युवा पिढीला आत्मनिर्भर करुन आत्मनिर्भर भारत करण्यासाठी सर्वांनी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबातील एक हजार मुलींना 50 हजार रुपयांच्या मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण सोहळा दिपलक्ष्मी मंगल कार्यालय, कवठेपिराण रोड, कसबे डिग्रज येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, आपत्तीच्या काळात निसर्ग सर्वांचीच परीक्षा घेत असतो, या काळात सर्वांनी धैर्याने राहून एकमेकाला मदतीचा हात दिला पाहिजे. भारतात सामाजिक कार्याची परंपरा खुप प्राचिन आहे. सन्मामार्गावर चालणारे लोक, परोपकराची ही परंपरा अखंडपणे चालवत आहेत. याच परंपरेशी नाते सांगणारे दिपाली सय्यद भोसले यांचे कार्य असून त्यांच्या ट्रस्टमार्फत होत असलेले कार्य खूप पुण्याचे आहे. आपत्तीग्रस्त भागाला मदत करण्याची त्यांच्यातील उर्जा प्रशंसनीय आहे. आपल्याकडे असणाऱ्या साधनसंपत्तीचा उपयोग सर्वांनीच चांगल्या कामासाठी करावा, असे सांगून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिपाली सय्यद- भोसले यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाच्या पातळीवरही व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यांना शुभाशिर्वाद दिले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात कन्या सहाय्य ठेव प्रमाणपत्राचे वितरण केले.
