‘मॅग्नेट’सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार
‘मॅग्नेट’सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार
बारामती येथे फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे भूमिपूजन
बारामती दि. 29 ऑगस्ट :
महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्पाव्दारे राज्यात एक हजार कोटीची कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सुविधा केंद्र उभारणारल्या जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पातंर्गत राज्यातील पहिल्या फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे भूमीपूजन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार जळोची येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत कृषी क्षेत्रात एक हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. आशियाई विकास बँक सातशे कोटी रूपये व राज्य शासन तीनशे कोटी रूपये गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पातंर्गत प्रत्येक जिल्ह्यात कृषिक्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे.
फळे व भाजीपाल्याचे जवळपास ४० टक्के नुकसान कृषी मुल्य साखळीच्या विविध टप्प्यामध्ये होते. एकूण नुकसानीपैकी ६० टक्के नुकसान हे प्रामुख्याने शेतापासून ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचेपर्यंत होते. शेतापासून शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत होणारे नुकसान हे योग्य काढणी पश्चात हाताळणी व कृषी मूल्य साखळीमधील सुविधा यामध्ये प्रामुख्याने साठवण व शीतसाखळी सुविधांच्या माध्यमातून कमी करता येवू शकते. राज्यातील डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची व फुलपिके या पिकांच्या मुल्यसाखळीमध्ये खाजगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास मदत होईल.
गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊनच्या काळात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असली तरी विकासाला गती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी टप्प्याटप्प्याने दोन हजार कोटी रूपये देण्यात येणार आहेत. बारामती येथे उभारण्यात येणारे पहिले फळ व भाजीपाला सुविधा हाताळणी केंद्र अभिमानास्पद वाटेल असे उभारणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
प्रकल्पाची एकूण किंमत ४२.८३ कोटी, प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या सुविधा शीतगृह ७०० मे. टन (प्रत्येकी १०० मे.टनाचे सात), प्रशितकरण ३० मे.टन( प्रत्येकी १० मे.टनाचे ३ ), संकलन व प्रतवारी केंद्र १२३३५ चौ. फूट, डाळिंब प्रक्रिया केंद्र ६९२१ चौ. फूट, हाताळणी यंत्रणा द्राक्षे २ मे.टन / प्रति तास, केळी २ मे.टन / प्रति तास, डाळिंब १.५ मे.टन / प्रति तास, फ्रोजन फ्रूट स्टोअर २५ मे.टन, ब्लास्ट फ्रिजर ५ मे.टन प्रति बॅच, इतर घटकांमध्ये वजन काटा, अग्निशमन यंत्रणा व विद्युतीकरण, डिस्पॅच डॉक, कार्यालय, माल आवक व जावक विभाग, वजन मापन व तात्पुरता साठवणूक कक्ष, स्त्री व पुरूष स्वच्छतागृह, पॅकींग मटेरिअल साठवणूक कक्ष, प्लॅट क्वॉरंटाईन कक्ष, प्रयोगशाळा,अंतर्गत रस्ते, भूमीगत पाण्याची टाकी, सुरक्षा रक्षक कक्ष संरक्षक भिंत व प्रवेशव्दार इत्यादीचा समावेश आहे.
