आबासारखा सहकारी, मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायमच राहील
आबासारखा सहकारी, मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायमच राहील
मुंबई, दि. 16 ऑगस्ट:
महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्वं, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली .
अजित पवार म्हणतात, ‘ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरतीप्रक्रियेच्या आबांच्या निर्णयानं हजारो गरीब युवकांना पोलिस दलाची दारं खुली करुन दिली. डान्सबार बंदी, गुटखाबंदीच्या त्याच्या निर्णयानं महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या वाचवल्या.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आर. आर. आबांनी यशस्वीपणे केलं. शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येकाला आदर असलेलं, आपलंसं वाटणारं त्यांचं नेतृत्वं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत, दु:ख कायम मनात राहणार आहे. स्वर्गीय आर. आर. आबांच्या स्मृतींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
