देशात मोठा सोशल चेंज व्हायला हवा !
देशात मोठा सोशल चेंज व्हायला हवा !
मुंबई दि. १२ ऑगस्ट :
नेतृत्व हे पुरोगामी विचाराचे व समाजात तेढ आणि कटुता न ठेवता करणारे हवे. त्यासाठी देशात मोठा सोशल चेंज व्हायला हवा. जनतेला मोकळा श्वास घेण्यास संधी मिळायला हवी मात्र आज देशात दडपशाही सुरु आहे असे स्पष्ट व परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मांडले.
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ६० वर्षांमध्ये कोणतीही अस्वस्थता दिसली नाही. मात्र मागील पाच-सात वर्षात ही अस्वस्थता पहायला मिळत आहे. १५ ऑगस्टला भारत ७५ वर्षाचा होतोय. यामध्ये प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने पाहिले गेले आहे. राज्याने पाच गोष्टींमध्ये बदल केला आहे. महाराष्ट्रात उत्तम शिक्षण सुरु झाले. रयत शिक्षण, अंजुमन इस्लाम या संस्था तयार झाल्या. आईवडिलांना सुरक्षित वाटणारे शिक्षण संस्था आपण तयार केल्या. आरोग्य हा दुसरा मुद्दा असून त्यामध्ये पोलिओ, देवी, कुष्ठरोग अशा अनेक रोगांवर आपण मात केली आहे. तिसरा मुद्दयामध्ये चांगल्या संस्था बांधल्या गेल्या. ज्यातून विचारांची देवाणघेवाण झाली. हे केवळ राज्यापूरते सिमित नाही. तर देशपातळीवर याची दखल घेतली आहे. चौथा मुद्दा नरेगा ही स्किम राज्याने केंद्राला दिली. स्वच्छ भारत योजना, रोजगार हमी योजना या महाराष्ट्राने तयार केल्या आणि केंद्राला दिल्या. आपल्या राज्याचे साहित्य हे फार मोठे आहे. राज्यातील साहित्य इतर राज्यांनी घेतले आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले.
यासोबतच अपयश असलेल्या बाजूही आहेत. यातील सर्वप्रथम मुद्दा हा लोकसंख्या आहे. लोकसंख्येवर आपण नियंत्रण करू शकलो नाही. त्यासोबतच पर्यावरण, अर्बन प्लॅनिंग, स्वच्छता या गोष्टींवर जे काम करायला हवे ते आपण अजूनही केलेले नाही. लिगंभेद हा अजून एक मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. यासाठी एक राज्यच नाही तर देश म्हणूनही आपण अपयशी ठरलो आहोत असे परखड मतही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केले.
देशातील लोकांवर प्रचंड विश्वास आहे. वर्तमान युवा पिढीत कोणताही मतभेद उरलेला दिसत नाही. त्यावर बोलताना ग्रामीण आणि शहरी भागात हा मतभेद याआधी दिसून येत होता. मात्र आता हा मतभेद दिसत नाही. सध्या सेमी इंग्रजी ही कल्पना सर्वत्र पहायला मिळते मात्र याचे दुष्परिणामही आहेत. खरंतर कोणत्याही भाषेचा द्वेष न करता आपल्या देशात हिंदी, स्थानिक भाषा, व इंग्रजी भाषेचे शिक्षण देणे गरजेचे आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
मागील राजकीय पिढीचा विचार केला तर अधिवेशनात येणारी विधेयक चर्चेतून किंवा विरोधकांची मत घेवून पास केली जायची आता मात्र विधेयकावर चर्चा करणे ही चुकीची गोष्ट वाटत असावी. यावेळच्या पावसाळी अधिवेशनात केवळ एका विधेयकावर चर्चा करण्यात आली आहे. राजकारण म्हटलं की वैचारिक मतभेद आलेच, मात्र यातही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शिवकणीतून आपली राजकीय नाती कशी जपावी ही गोष्ट महाराष्ट्राने अजूनही पाळली आहे. आणीबाणी हा काळ आपल्या कोणालाच आवडणारा नव्हता. तशीच परिस्थिती आज देशात पहायला मिळत आहे. केंद्रातील संस्थेचा गैरवापर होतोय, मिडीयावर वचक ठेवला जातोय. या सगळ्या गोष्टी मला आपण कपड्याने लिब्रल झालो पण विचाराने लिब्रल झालेलो नाही हे दाखवत आहेत असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
पर्यावरण हा विषय अतिशय गंभीर आहे. यासाठी खरंतर देशातले लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. कचरा, पाण्याचे नियोजन, प्लास्टिक अशा अनेक गोष्टीतून पर्यावरणाची हानी होत आहे. याचे सुनियोजन करणे जरुरी आहे. भारतीय नागरिक आपले घर अतिशय स्वच्छ ठेवतील मात्र घराबाहेर गेल्यावर पर्यावरण स्वच्छ ठेवणे कोणालाही जमत नाही. पर्यावरण हे खातं फार हलके आहे असा सगळ्यांचा समज आहे. मात्र सद्यस्थितीला पर्यावरण या खात्याकडे मोठी जबाबदारी आहे. यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने शहर व ग्रामीण भागाचे योग्य नियोजन करायला हवे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.
