पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात मंत्री जयंत पाटील ‘ऑन ग्राऊंड झिरो’!
पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात मंत्री जयंत पाटील ‘ऑन ग्राऊंड झिरो’ !
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची ‘अशी’ केली पाहणी.
सांगली, दि. २४ जुलै :
अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन…तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने….पाण्याच्या मार्गात बोटीचा वापर करत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटलांनी शनिवारी सकाळ पासून जनतेच्या समस्यांसाठी दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेत धीर दिला.
पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सकाळी ८.३० वाजल्यापासून पाहणी दौरा सुरू केला तो १२ तासानंतरही सुरूच होता. आतापर्यंत पाटील यांनी जिल्ह्यातील जवळपास १५ पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या आहेत. या पाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत त्यांना जेवण पाण्याची व्यवस्था केली तसेच अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून योग्य त्या सूचनाही दिल्या.

मुसळधार पावसामुळे वाळवा आणि शिरगाव येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढली की शिरगाव या गावचा संपर्क तुटतो. गतवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना उपलब्ध केलेल्या बोटींच्या साहाय्याने या भागातील ६०० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या भागात पाण्याचा निचरा जरी संथ गतीने होत असला तरी जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी प्रशासन आणि नागरिक एकजुटीने कार्य करत आहे.

वाळवा तालुक्यातील शिगाव येथे वारणा नदीला आलेल्या पुराची व मिरज तालुक्यातील दुधगाव, कसबे डिग्रज येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पूर प्रवण क्षेत्रातील अनेक कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांची योग्य व्यवस्था झाली आहे का याची जयंत पाटील यांनी स्वतः चौकशी केली.
मुंबईवरून सांगलीला जात असतानाही जयंतराव पाटील हे सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते. २०१९ च्या महापूराचा अनुभव लक्षात घेता जयंतराव यांनी आधीच हालचाली सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
